Monday, September 30, 2013

नेटशेतीत पिकवली ढोबळी मिरची

येवला तालुक्यातील शेतकरीही आता हायटेक शेती करू लागले आहेत. कृषी खात्याच्या मदतीने पॉलीहाऊस अर्थातच नेट शेतीचा वापर करत येवल्यातील पिंपळगाव जलाल येथील शामराव खोकले यांनी दीड एकर शेतीत ढोबळी मिरची लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले आहे.

येवला तालुका हा तसा दुष्काळी तालुका त्यामुळे येथील शेतकरी पारंपरिक शेतीच आजपर्यंत करत आले. मात्र आता कृषी विभागाच्या मदतीने येथील शेतकरी हळूहळू इतर पिके घेण्याकडे वळू लागले आहेत. शामराव खोकले यांनी आपल्या दीड एकर जमिनीवर पॉलीहाऊसची उभारणी केली. त्यात त्यांनी बॅलाडिन जातीची ढोबळी मिरचीची वरंभा पद्धतीने लागवड केली असून त्यात ते यशस्वीही ठरले आहेत. 

या शेतीत त्यांनी दीड फूट अंतरावर मिरचीची हजार रोपांची लागवड फेब्रुवारीला केली. वरंभा पद्धतीने लागवड करते वेळी पाच ट्रेलर शेणखत त्यांनी दिले, त्यासाठी तेरा हजार रुपये एवढा खर्च आला. पॉलीहाऊस उभारणीस साडेचार ते पाच लाख रुपये खर्च केले. तर पाणी देण्यासाठी ठिबकसिंचनाचा वापर करून त्यांनी डी.पी.ए खत वापरले. पॉलीहाऊसमध्ये रोपांचा तीव्र सूर्यप्रकाशापासून बचाव झाल्याने रोपांची वाढही योग्य झाली. या सर्व गोष्टी काळजीपूर्वक केल्याने थोड्याच दिवसात त्यांना उत्पादन मिळू लागले व योग्य देखभालीमुळे एका झाडाला २५० ते ३०० ग्रॅम वजनाची ढोबळी मिरची त्यांना मिळू लागली. या उत्पादनापासून दहा ते बारा हजार रूपये त्यांना रोज मिळतात. पॉलीहाऊस, फवारणी, खत यांचा ५ ते ६ लाख रुपये खर्च वजा जाता त्यांना या हायटेक शेतीतून तीन लाख रूपये नफा मिळणार असल्याचे शामराव खोकले सांगतात. 

येवला तालुक्यातील या हायटेक शेतीबाबत तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर हेही भरभरून बोलतात. तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीच्या शेतीचा फायदा घ्यावा यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून काहींनी केलेले प्रयोग आतापर्यंत यशस्वी ठरले आहेत. यापुढेही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्राचा वापर केल्यास त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, असे कुळधर यांनी सांगितले. हायटेक शेतीसाठी लागणाऱ्या कर्ज पुरवठ्यासाठी बॅंकांचे अधिकारी आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे जाऊ लागले असून शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रे, निकष, अटींची पूर्तता केल्यास त्यांना पंधरा दिवसात कर्ज दिले जाते.

No comments:

Post a Comment