Wednesday, November 13, 2013

कलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा

पापरी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील बाबूराव भोसले हे परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. गेल्या सहा वर्षांपासून भोसले कलिंगडाची लागवड करीत आहेत. बाजारपेठेनुसार लागवडीचे नियोजन, सुधारित तंत्राने लागवड, एकात्मिक पीक व्यवस्थापन आणि गटशेतीतून कलिंगडाचे किफायतशीर उत्पादन मिळते असा त्यांचा अनुभव आहे. किरण जाधव 
इतरांपेक्षा काही तरी नवीन करून दाखविण्याचे, त्या विषयाबाबत आपली स्वतः ओळख निर्माण करायची, अशी जिद्द बाळगणारे अनेक शेतकरी राज्यात आहेत. या शेतकऱ्यांपैकीच एक आहेत कलिंगड लागवडीतून स्वतःची ओळख निर्माण करणारे पापरी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील बाबूराव राऊ भोसले. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. कायम पाण्याची टंचाई असलेल्या भागात शेती असल्याने कमी कालावधीत, कमी खर्चात उत्पादन देणाऱ्या पिकांच्या शोधात ते असतात. त्यांच्या प्रयत्नांना घरच्यांचीही तेवढीच मोलाची साथ असल्याने टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, खरबूज आणि कलिंगडाचे चांगले उत्पादन त्यांनी घेतले आहे. शेतीमधील नवीन प्रयोग पाहण्यासाठी त्यांच्या शेतावर परिसरातील शेतकऱ्यांचा कायम राबता असतो. 

अभ्यासातून साधले कलिंगडाचे पीक कलिंगड लागवडीबाबत अनुभव सांगताना भोसले म्हणाले, की माझी अठरा एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्र मी ठिबकखाली आणले आहे. सध्या माझ्याकडे दोन एकर टोमॅटो, एक एकर ढोबळी, दोन एकर कलिंगड, डाळिंब अडीच एकरावर आहे. मी पहिल्यापासून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन पीक लागवड, व्यवस्थापन आणि बाजारपेठांचा अभ्यास करायचो. आमच्याकडे लिंबाची बाग होती, त्यामुळे विविध बाजारपेठांत लिंबू विक्रीसाठी मी जात असे. त्या वेळी मला कलिंगड, टरबूज फळांच्या मागणीचा आणि दराचा अंदाज आला. सन 2007 मध्ये पहिल्यांदा एक एकरावर जानेवारी महिन्यात कलिंगड लागवडीला सुरवात केली. चांगल्या उत्पादनाच्यादृष्टीने पहिल्यापासून गादीवाफा पद्धतीने लागवड, मल्चिंग पेपरचा वापर आणि ठिबक सिंचनावर भर दिला. त्यातून मग टप्प्याटप्प्याने लागवड क्षेत्र वाढवीत गेलो. मी जूनमध्ये दोन एकर कलिंगड लागवड करतो. त्याची फळे रमझान सणाच्यावेळी मिळतात. परंतु हे उत्पादन पावसाच्या भरवशावर असते. पण दर चांगला मिळतो. त्यानंतर दुसऱ्या क्षेत्रात डिसेंबरमध्ये दीड एकराचे टप्पे करून दर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने सरासरी दहा एकरावर कलिंगड लागवड करतो. ही लागवड मार्चपर्यंत चालू असते. गेल्या वर्षी मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक एकरावर सुधारित पद्धतीने कलिंगडाची लागवड केली होती. या लागवडीसाठी डिसेंबरमध्ये शेताची चांगली नांगरट करून एकरी 20 गाड्या शेणखत मिसळून दिले. त्यानंतर दोन गादीवाफ्यात तीन फुटाचे अंतर येईल या प्रमाणे पॉवर टिलरच्या साहाय्याने अडीच फूट रुंदीचा आणि 10 इंच उंचीचा गादीवाफा तयार केला. गादीवाफ्यामध्ये एकरी 100 किलो 18ः46ः0, 50 किलो पोटॅश, 250 किलो निंबोळी पेंड,10 किलो झिंक सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट,10 किलो मॅग्नेशिअम सल्फेट, तीन किलो फोरेट, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून दिली. गादीवाफा एकसमान करून मधोमध ठिबकची लॅटरल अंथरली. दोन दिवस ठिबक संचातून पाणी सोडून लॅटरल तपासून घेतल्या. त्यानंतर गादीवाफ्यावर चार फूट रुंदीचा 30 मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरला. पेपर गादीवाफ्याला बेडला समांतर राहील, तो ढिला पडणार नाही याची काळजी घेतली. कारण मल्चिंग पेपर ढिला राहिला तर वाऱ्यामुळे फाटण्याची शक्‍यता असते. परागीभवनासाठी शेतात मधमाश्‍यांच्या दोन पेट्या ठेवलेल्या आहेत. 

रोप लागवडीच्या आदल्या दिवशी लॅटरलच्या दोन्ही बाजूंस 15 सें.मी. अंतरावर रोप बसेल अशी छिद्रे पाडली. एका ओळीतील दोन छिद्रांमधील अंतर दोन फूट ठेवले. छिद्रे पाडून झाल्यावर ठिबक सिंचन संच सुरू करून गादीवाफा ओला करून घेतला. वाफसा आल्यावर नंतर छिद्रे पाडलेल्या ठिकाणी 12 दिवस वयाच्या रोपांची लागवड केली. एकरी 6000 रोपे बसली. लागवडीनंतर पहिले सहा दिवस रोज 10 मिनिटे पाणी देण्यास सुरवात केली. त्यानंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी नियोजन ठेवले. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लागवडीनंतर आठव्या दिवसापासून दोन किलो 19-19-19 सलग 15 दिवस दिले. त्यानंतर 15 दिवस 12ः61ः0 हे खत दोन किलो दिले. त्यानंतर 15 दिवस 0-52-34 दोन किलो ठिबकमधून दिले. फळे तयार होताना 50 ते 60 दिवसांच्या दरम्यान जर फळामध्ये साखरेचे प्रमाण कमी वाटले आणि फळास चकाकी येत नसेल, तर गरजेनुसार 0-0-50 या खताची दोन किलो मात्रा एक किंवा दोन दिवस देतो. 

एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर भर - कलिंगडावर प्रामुख्याने मावा, फुलकिडे व नाग अळी या किडींचा, तसेच भुरी, करपा, केवडा या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. त्यामुळे लागवडीनंतर सात ते आठ दिवसांनंतर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीत कीडनाशकांची फवारणी करतो. त्यानंतर कीड, रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत कीडनाशकांच्या फवारण्या घेतो. फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी आठ कामगंध सापळे लावतो. फुलकिडी, मावा किडीच्या नियंत्रणासाठी शेतात आठ ठिकाणी पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या 1 x 1.5 फूट आकाराच्या पट्ट्या लावतो. त्यावर ग्रीस लावून ठेवतो. त्यावर किडी चिकटतात. एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रणावर माझा भर असतो. 

प्रतवारी करूनच विक्री - फळाची पहिली तोडणी ही लागवडीपासून 60 ते 65 दिवसांनी केली. काढणी करण्यापूर्वी फळांची पक्वता, बाजारपेठ, रंग, आकार या गोष्टींचा विचार करून तोडणी केली. फळांचा आकार तसेच फळांची प्रतवारी करून चांगल्या प्रतीची फळे मोठ्या बाजारपेठेत (मुंबई, पुणे या ठिकाणी) पाठविली, तर मध्यम व कमी दर्जाची फळे स्थानिक बाजारपेठांमध्ये पाठविली. फळांचे वजन सरासरी तीन ते पाच किलोच्या दरम्यान असते. सरासरी प्रति किलो सात ते दहा रुपये असा दर मला मिळाला. प्रति एकरी 32 टन उत्पादन मिळाले. जमिनीची मशागत ते काढणीपर्यंतचा एकरी पीक व्यवस्थापनाचा खर्च 82,500 इतका आला. खर्च वजा जाता निव्वळ नफा मला दोन लाखांपर्यंत राहिला. 

शेतकरी गटातून प्रगती -- कृषी विज्ञान केंद्र आणि नाबार्डच्या सहकार्याने "शिवकृपा नाबार्ड फार्मर्स क्‍लब' अडीच वर्षापासून कार्यरत. 
- कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. ला. रा. तांबडे, प्रा. गोंजारी, प्रा. अली यांचे मार्गदर्शन.
- गटशेतीवर भर. खरबूज, आले, कलिंगड, ढोबळी मिरचीची गटशेती. एकत्रित विक्रीचे नियोजन, व्यापारी शेतावर येऊन खरेदी करतात. 
- गावात गटाचे कार्यालय, दररोज सकाळी पीक व्यवस्थापनावर चर्चा. 
- "शिवकृपा' हा ब्रॅण्ड तयार केला, त्यामुळे बाजारपेठेत गटातील शेतकऱ्यांच्या फळांना वेगळी ओळख, त्यामुळे चांगला दर. 
- एकत्रित बियाणे, खते, कीडनाशकांची खरेदी. 
- प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर शिवारफेरी, त्यातून पीक व्यवस्थापन आणि बाजारपेठेचे नियोजन. 

संपर्क - बाबूराव भोसले, 9822920642, 
किरण जाधव, 0217-2350359 

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment