Tuesday, November 12, 2013

"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न

वाळवा तालुक्‍यात उसात सोयाबीनऐवजी भुईमूग हे आंतरपीक म्हणून पुढे येत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. भुईमुगाच्या ओल्या शेंगांना मुंबईची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. सोयाबीनच्या तुलनेत नुकसानीचे कमी "टेन्शन', कमी श्रम व कमी खर्च यामुळे शेतकरी तालुका भागात याच पिकाचे नियोजन चांगल्या प्रकारे करू लागला आहे. श्‍यामराव गावडे 
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या सान्निध्यात वाळवा संपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शेतकरी सोयाबीन, भुईमूग अशी आंतरपिके घेतात. परंतु सोयाबीनवरील तांबेरा तसेच काढणी-मळणीची अडचण व हंगामादरम्यान घसरणारा दर यामुळे शेतकरी अनेकवेळा अडचणीत येतो. त्या तुलनेत भुईमुगाच्या ओल्या शेंगा विकून नफा मिळवण्याचे तंत्र त्याने आत्मसात केले आहे. 

वाळवा तालुक्‍यातील स्थिती तालुक्‍यात सुमारे दोन हजारांहून अधिक एकर क्षेत्रावर भुईमुगाचे आंतरपीक घेतले जाते. सुमारे तीन महिन्यांत सोयाबीनच्या तुलनेत कमी श्रमात हे पीक ऊस पिकातील बहुतांश उत्पादन खर्च भरून काढते. त्याचबरोबर तणांचे नियंत्रण होण्यासही मदत होते. मुख्य म्हणजे त्याचा बेवड चांगला असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. 

शेंगांना मिळाली मुंबईची बाजारपेठ वाळवा तालुक्‍यातील इटकरे येथे शिवसाई भाजीपाला संघ आहे. त्याद्वारे तालुक्‍यातील भाजीपाला मुंबईला विक्रीसाठी जातो. शेताच्या बांधावर संघाची वाहतूक गाडी येत असल्याने शेतकऱ्यांची सोय झाली आहे. मागील चार वर्षांत प्रायोगिक स्वरूपात शेतकऱ्यांनी ओल्या भुईमुगाच्या शेंगा विकल्या. त्याला चांगला भाव मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी या पिकाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवले. यंदाच्या हंगामात तर ओल्या शेंगांना प्रति किलो 50 ते 51 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. 

शेतकऱ्यांचे अनुभव येलूर येथील अनिल रंगराव महाडीक यांची सहा एकर शेती आहे. वर्षाला ते सुमारे दोन एकरांवर उसात भुईमूग घेतात. ते बीजोत्पादनही करतात. शेंगा वाळवणे, निवडणे व फोडून बियाण्यांची विक्री करणे हे काम फायदेशीर असले तरी त्रासदायक आहे. त्यामुळे महाडीक यांनी गेल्या दोन वर्षांपासून भुईमुगाच्या ओल्या शेंगा मुंबई बाजारपेठेत पाठविण्याचा नवा मार्ग शोधला आहे. त्यांनी विकलेल्या शेंगांना यंदा प्रति किलो 48 ते 51 रुपये दर मिळाला आहे. ते म्हणाले, की सोयाबीनप्रमाणे या पिकात शेंगा काढणीचा त्रास नाही. सोयाबीनपेक्षा जास्त नफा या पिकातून होतो. यंदा प्रतिकूल पाऊसमानामुळे उत्पादन फारसे समाधानकारक नाही. तरीही चांगले लक्ष देऊन दरवर्षी पीक व्यवस्थापन केल्यास एकरी 30 पोती (प्रति 50 किलो) उत्पादनापर्यंत पोचता येते. 

दिलीप धोंडिराम घोरपडे (बहादूरवाडी) अनेक वर्षांपासून भुईमुगाचे खरीप व उन्हाळी अशा दोन टप्प्यांत भुईमुगाचे उत्पादन घेतात. उन्हाळ्यात ऊस तुटून गेल्यानंतर व त्यानंतर खरिपात उसात हे पीक असते. या वर्षी दोन्ही हंगामांत मिळून 120 पोती ओल्या शेंगाची त्यांनी विक्री केली. उन्हाळी हंगामात 60 गुंठ्यांत 80 पोती उत्पादन मिळाले. 

शिवसाई संघातर्फे मुंबईत विक्री केली. प्रति क्विंटल सरासरी 4500 ते 5100 रुपयांपर्यंत दर मिळाला. 
अर्थात, एरवी सरासरी दर किलोला 30 रुपये असतो. घोरपडे म्हणाले, की भुईमुगाचा बेवड चांगला राहतो. भुईमुगाच्या वेलांचा उसाच्या मुळाजवळ खत म्हणून चांगला वापर होतो. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत यंदा खर्च वजा जाता सुमारे पन्नास हजार रुपयांपर्यंत नफा झाला. 
माझ्या भागातील हवामान, ठिबक सिंचन, जमीन या गोष्टी अनुकूल ठरल्याने उत्पादकता चांगली असते. 
उसाच्या एकरी 40 ते 45 हजार रुपये खर्च भुईमूग भरून काढतो. ओल्या शेंगाच विकायच्या असल्याने वाळवणी तसेच अन्य "टेन्शन' नाही. 

प्रमोद धोंडिराम शेवडे यांना अडीच एकर क्षेत्रावरील भुईमुगाच्या आंतरपिकातून सुमारे 45 क्विंटल उत्पादन मिळाले. शिवसाई खरेदी विक्री संघामुळे शेतकऱ्यांना मुंबईच्या बाजारपेठेची माहिती मिळाली. आपल्या नजरेसमोर वजन केले जाते. पारदर्शक व्यवहारामुळे शेतकऱ्यांशी त्या संघाचे नाते घट्ट झाले आहे. 

नवेखेड येथील गुरुनाथ चव्हाण यांच्या भुईमुगाच्या शेंगांना बाजारात 35 ते 38 रुपये प्रति किलो 
दर मिळाला. पुणे येथील बाजारपेठेत त्याची विक्री झाली. चव्हाण हे सहकारी साखर कारखान्यात नोकरी करतात. आई व पत्नी यांच्या मदतीने शेती करतात. ते म्हणाले, की जूनच्या अखेरीस फुले प्रगती वाणाची टोकण केली. ठिबक सिंचन असल्यामुळे पिकाची चांगली वाढ झाली. सुमारे दीड एकर क्षेत्रात 20 क्विंटल शेंगांचे उत्पादन मिळाले. पुढील वर्षी लवकर नियोजन करून भुईमुगाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. सध्या उसाची परिस्थिती चांगली आहे. 

भुईमुगाचे मोठे क्षेत्र वाळवा तालुक्‍यात बहुतांशी ठिकाणी ठिबक सिंचनाची सोय असल्याने भुईमूग चांगला पोसतो. तांदूळवाडी, मालेवाडी, येलूर, इटकरे, येडेनिपाणी, कामेरी, गोटखिंडी, कोरेगाव, नागाव, भडकंबे, बागणी, बावची, शिगाव, वशी, कुरळप, ऐतवडे खुर्द या परिसरातील जमीन भुईमुगाला पोषक आहे. या ठिकाणी पिकाचे चांगले उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी म्हणतात. शेंगांचा आकार मोठा, एका शेंगेत सुमारे चार दाणे व कडक अशा वाणांची निवड केल्याने मुंबईत बाजारपेठेत चांगला दर मिळतो. 15 जूनच्या दरम्यान टोकणी गरजेची असते. गणेश चतुर्थी दरम्यान भुईमूग निघाल्यास शेंगांना चांगली मागणी राहते. 

विशेष म्हणजे शेंगा तोडणीसाठी महिला मजुरांची उपलब्धता असते. मजुरी पैशाऐवजी शेंगांच्या स्वरूपात दिली जाते. मजुरांनी दिवसभरात तोडलेल्या शेंगांचे समान दोन भाग केले जातात. त्यातील एका भागाचे पुन्हा समान सात भाग केले जातात व एक भाग मजुरी म्हणून दिला जातो. 

सोयाबीन पिकापेक्षा हे पीक शेतकऱ्यांना अनेक बाबतीत सुलभ वाटत आहे. त्याचे कारण म्हणजे सोयाबीनचा उत्पादन खर्च सुमारे 10 ते 11 हजार रुपयांपर्यंत येतो. एकरी 10 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. 

हंगामात प्रति क्विंटल 2200, 2500 ते तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. त्या तुलनेत सुमारे 90 दिवसांच्या कालावधीत ओल्या भुईमूग शेंगा किफायतशीर रक्कम हाती देऊन जातात. घोरपडे यंदाच्या वर्षीची परिस्थिती सांगताना म्हणाले, की दोन हंगामांत मिळून दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम या पिकातून हाती पडली आहे. 

आंतरपीक भुईमुगाचे फायदे -भुईमुगाचा बेवड ऊस पिकाला चांगला. 
-भुईमुगाच्या वेलांचा कंपोस्ट खत म्हणून वापर. 
-किडी-रोगांचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या तुलनेने कमी राहतो. 
-मळणी व तोडणीसाठी मजुरांची उपलब्धता सहजगत्या होते. 
-माल साठवणूक करून ठेवावा लागत नाही. 
-ओल्या शेंगांची विक्री असल्याने उन्हात वाळवण करावी लागत नाही. 

विक्री व्यवस्था चांगली आहे शिवसाई भाजीपाला संघ विक्री व्यवस्था पाहतो. त्याचे फायदे असे. 

* शेतकऱ्यांच्या मालाला मुंबई-पुणेची बाजारपेठ उपलब्ध. 
* सध्याच्या कार्यालयात वजने करण्याची सोय आहे. 
* विक्रीनंतर सुमारे आठवड्याने शेतकऱ्यांना पेमेंट केले जाते. 
* शेतकऱ्यांचा माल कितीही असो, मागणी आली की संघाचे वाहन शेतकऱ्यांच्या शेतावर येते. 
* पुणे - बंगळूर महामार्गावर येडेनिपाणी नजीक संघाचे कार्यालय. 

संपर्क- 
अनिल महाडीक, 9975188316 
दिलीप घोरपडे, 9421303714 
प्रवीण शेवडे, 9011188121

No comments:

Post a Comment